काँग्रेस नेतृत्वावर विश्वास

By Admin | Updated: May 20, 2014 03:09 IST2014-05-20T03:09:09+5:302014-05-20T03:09:09+5:30

पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शविली.

Confidence in Congress leadership | काँग्रेस नेतृत्वावर विश्वास

काँग्रेस नेतृत्वावर विश्वास

शीलेश शर्मा, नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. परंतु हा प्रस्ताव ठामपणे अमान्य करून कार्यकारिणीने याच दोघांच्या नेतृत्वावर नि:संदिग्ध विश्वास व्यक्त करणारा ठराव एकमताने मंजूर केला. एवढेच नव्हे तर पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे व पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी योग्य ती सर्व पावले उचलण्याचे अधिकारही कार्यकारिणीने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते राज बब्बर म्हणाले की, पक्ष आपल्या नीती-धोरणांसाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यापुढेही लढा सुरूच ठेवेल. बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी पक्षातर्फे औपचारिक पत्रकार परिषद झाली नाही. त्याआधी ‘निवडणुकीतील पराभवास माझ्यासह सर्वच जण जबाबदार आहेत,’ या सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्या वक्तव्याने कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया व राहुल गांधींसह कार्यकारिणीचे सदस्य राजीनामा देतील, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. प्रचाराची धुरा सोपविलेल्या राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रचाराची मोहीम हाताळली त्याबद्दल पक्षात कुरबुरी सुरू झाल्यावर अहमद पटेल म्हणाले होते की, या निकालासाठी कोणाही एका व्यक्तीला कसे काय जबाबदार धरता येईल? पक्ष व सरकार या दोघांचीही ही एकत्रित जबाबदारी आहे. पक्षाच्या पराभवास माझ्यासह सर्वच जबाबदार आहेत. पक्षाचे काही नेते व कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी व त्यांच्या निवडक सहकार्‍यांच्या कार्यपद्धतीबद्दल दबक्या आवाजात व्यक्त केली जाणारी नाराजी कार्यकारिणीच्या बैठकीत अडचणीचे ठरतील, असे प्रश्न जाहीरपणे उपस्थित करण्यात प्रतिबिंबित होऊ नये, यासाठी सोनिया व राहुल गांधी यांनी राजीनामे द्यायचा प्रस्ताव करायचा, म्हणजे उघडपणे कोणी टोकाची भूमिका घेणार नाही, अशी व्यूहरचना पक्षनेत्यांनी आधीच केली होती, असेही काही सूत्रांचे म्हणणे आहे. ही एकट्याची नव्हे तर सर्वांचीच जबाबदारी आहे, ही विविध नेत्यांनी बैठकीआधी केलेली वक्तव्ये हाही याचाच एक भाग होता, असेही या सूत्रांना वाटते. खरेतर कार्यकारिणीतील अनेक सदस्य पराभवाबद्दलचा आपला राग व्यक्त करण्याची शक्यता होती. पण जे बदल करायला हवे होते, ते मी घडवू शकले नाही. त्यामुळे सर्वात मोठी जबाबदारी माझी आहे, असा पवित्रा स्वत: सोनिया यांनीच घेतल्यानंतर बैठकीतील चित्र बदलले. एक-एक करून प्रत्येकाने स्वत:वर जबाबदारी घ्यायला सुरुवात केली आणि चिंतनाला विराम दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Confidence in Congress leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.