Chinnaswamy Stadium Stampede RCB’s victory celebration in Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अर्थात RCBian चाहता हा माझ्या रक्तात RBC नव्हे तर RCB घटक आहे, असं म्हणत विराट कोहलीच्या संघावर प्रेम व्यक्त करत आलाय. या प्रेमापोटी चाहत्यांच रक्त सांडेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण RCB नं ट्रॉफी जिंकली अन् IPL चॅम्पियन्सना पाहण्यासाठी बंगळुरुमध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. आरसीबीच्या स्वागतासाठी आधी खुल्या बसमधून खेळाडूंची जंगी मिरवणूक काढण्याचा प्लॅन ठरला होता. पण वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊ ते नियोजन बारगळले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेलिब्रेशनचा घाट घातला अन् तो घात करणारा ठरला
चाहत्यांनी संघाच्या पहिल्या विजयाच्या सेलिब्रेशनचा घाट घातला अन् तो काही चाहत्यांसाठी घातक ठरला. बंगळुरु शहरात आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना जे घडलं ते मन सुन्न करणारे असे होते. लाल जर्सीतील RCB च्या संघाने १७ वर्षांनी पहिली ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करताना जमलेली गर्दी अन् त्यादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत काही चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना गंभीर दुखापत झाली असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे चित्रही पाहायला मिळाले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
नेमकं काय घडलं?
पाऊस असतानाही विधान सौधा ते चिन्नास्वामी एम. चिन्नास्वाम स्टेडियम या मार्गावर हजारोच्या संख्येनं चाहत्यांनी हजेरी लावली होती. समोर येणाऱ्या माहितीनुसार, चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून अरुंद गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अन् एकच गोंधळ उडाला. या घटनेत १० पेक्षा अधिक लोकांनी जीव गमावला असून त्याहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्देवी घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.