ब्रह्मपुत्रचा प्रवाह चीनने अडवला
By Admin | Updated: October 2, 2016 00:50 IST2016-10-02T00:50:59+5:302016-10-02T00:50:59+5:30
चीनने तिबेटमध्ये सर्वांत महागडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या एका मोठ्या उपनदीचा प्रवाह अडविला आहे. याचा फटका ईशान्य भारताला बसण्याची भीती

ब्रह्मपुत्रचा प्रवाह चीनने अडवला
बीजिंग : चीनने तिबेटमध्ये सर्वांत महागडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या एका मोठ्या उपनदीचा प्रवाह अडविला आहे. याचा फटका ईशान्य भारताला बसण्याची भीती आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या हालचाली
सुरू केल्या असतानाच हे वृत्त आले आहे.
तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रला यारलुंग झांगबो असे म्हटले जाते. तिच्या झियाबुकू नावाच्या उपनदीवर चीन ७४0 दशलक्ष डॉलर खर्च करून मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. तिबेटच्या झिगाझे प्रांतात हा प्रकल्प लाल्हो नावाने उभारला जात आहे. हा भाग सिक्कीमला लागून आहे. झिगाझेमधूनच ब्रह्मपुत्र अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. या प्रकल्पाचे बांधकाम जून २0१४ मध्येच सुरू झाले. २0१९ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. या प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये काय परिणाम होईल, याचा आताच अंदाज बांधणे कठीण आहे.
गेल्या वर्षी चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रवरच १.५ अब्ज डॉलर खर्चाचा झाम जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यामुळे भारताच्या चिंता आधीच वाढलेल्या आहेत. तथापि, चीनने यासंबंधीची भीती आधीच दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकल्प पाणी कायम स्वरूपी साठवून ठेवणारे नसल्यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही, असे चीनने म्हटले आहे.
चीनने तिबेट ताब्यात पूर्ण ताब्यात घेतलेला असून, त्याला स्वायत्त प्रदेश असे नाव दिले आहे. चीनच्या प्रकल्पांविषयी भारताने आधीच चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
परिणाम आता वर्तवणे अवघड
पाणी अडविल्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये काय परिणाम होईल, याचा आताच अंदाज बांधणे कठीण आहे. गेल्या वर्षी चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रवरच झाम जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केला होता.