सरन्यायाधीश मोदींवर नाराज
By Admin | Updated: August 16, 2016 01:17 IST2016-08-16T01:17:59+5:302016-08-16T01:17:59+5:30
देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला

सरन्यायाधीश मोदींवर नाराज
नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशातील न्यायव्यवस्थेपुढे असलेल्या समस्यांविषयी साधा उल्लेखही केला नसल्याने देशाचे सरन्यायधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती, असे न्या. ठाकूर यांनी म्हटले.
‘मी माझ्या करिअरच्या शिखरावर पोहोचलो आहे, त्यामुळे मला काय वाटते याबद्दल बोलण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. मी खरेच बोललो पाहिजे, जे तुमच्या मनाला भिडेल... आपले जगप्रसिद्ध पंतप्रधान, कायदेमंत्री यांचे भाषण आपण सगळ्यांनी ऐकले. या भाषणात ते कायदा व न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत काहीतरी उल्लेख करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याविषयी काहीही बोलण्यात आले नाही,’ अशा शब्दांत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. ‘ब्रिटिशांच्या साम्राज्यात १० वर्षांत केसेसवरील निकाल लागायचा; पण आता तेही होत नाही. लोकांच्या अपेक्षा आणि केसेसच्या संख्या इतक्या वाढल्या आहेत की उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मी पंतप्रधानांना या मुद्द्याकडे लक्ष देण्याची वारंवार विनंती केली,’ असे न्या. ठाकूर यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी न्या. ठाकूर यांनी एका कार्यक्रमात अत्यंत भावनिक होऊन पंतप्रधानांना भारतीय न्यायव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली होती.
तथापि, केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोणत्याही परिस्थितीत करण्यात येतील, असे स्पष्ट केले. ‘किमान सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांच्या आड एमओपी (मेमोरँडम आॅफ प्रोसिजर) येणार नाही,’ असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालय असे चित्र पाहायला मिळाले. ‘बेरोजगारी आणि शोषण या दोन गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळेल तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळेल,’ असे अॅड. ठाकूर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)