शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान

By Admin | Updated: June 16, 2014 04:00 IST2014-06-16T04:00:43+5:302014-06-16T04:00:43+5:30

शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे

Challenge to create space for the World University of Education | शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान

शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान

पुणे : शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते आयसरसारख्या संस्था पेलतील, याचा मला विश्वास आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयसर) पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बोर्ड आॅफ गव्हर्नरचे अध्यक्ष टी.व्ही. रामकृष्णन, आयसरचे संचालक के.एन. गणेश, कुलसचिव जी. राजशेखर व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाश गुरू या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती म्हणाले, मानवाच्या जीवनात विज्ञान महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे ज्ञानावर आधारित समाज निर्माण होत आहे. यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनावर भर देणारी शिक्षणपद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. हे ध्येय बाळगून आयसर ‘सायन्स आऊटरिच प्रोग्राम’ राबवत आहे, ज्याच्या माध्यमातून संस्थेबाहेर शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये आयसरचे विद्यार्थी मूलभूत विज्ञान पोहोचवत आहेत. भारताला शिक्षण आणि संशोधनाची प्राचीन परंपरा आहे. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे जागतिक स्तरावर प्रसिद्ध होती. त्यामुळे उच्च शिक्षणात भारत दीड हजार वर्षे अव्वल होते. पण ही परंपरा खंडित झाली. पुन्हा हा गौरव प्राप्त करण्यासाठी विज्ञानाच्या मूलभूत शाखांचा विकास व्हायला हवा, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.
इराणी म्हणाल्या, आपली अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. ती ज्ञानावर आधारित करायची असल्यास उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे. याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असून, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आपल्याकडील नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे. त्यावर भविष्यात आपला विकास होणार नाही. त्यामुळे गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ आणि नवकल्पनांच्या जोरावरच आपण विकास साधू शकतो. त्यासाठी आयसरसारख्या संस्थांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Challenge to create space for the World University of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.