नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून लवकरच साखरेवरील आयात शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या साखरेवरील आयात शुल्क 50 टक्के इतके आहे. ते वाढवून 100 टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा इरादा असल्याचे कळते. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानला चांगलाच फटका बसू शकतो. पाकिस्तानमध्ये यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने १५ लाख टन साखर निर्यात करण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी प्रतिटन १० हजार ७०० रुपये निर्यात अनुदान दिले जाणार आहे. ही साखर भारतात निर्यात केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतातील साखरेच्या किमती आणखी घसरतील, अशी शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानचं तोंड साखरेने होणार 'कडू' ; मोदी सरकारचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:07 IST