कावेरी पाणी पेटले, कर्नाटक-तामिळनाडूत हिंसाचार
By Admin | Updated: September 12, 2016 16:41 IST2016-09-12T16:19:19+5:302016-09-12T16:41:15+5:30
१२ हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर कर्नाटकच्या काही भागात सोमवारी जोरदार हिंसाचार झाला.

कावेरी पाणी पेटले, कर्नाटक-तामिळनाडूत हिंसाचार
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १२ - कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये हिंसाचार उसळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला कावेरी नदीचे १२ हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर कर्नाटकच्या काही भागात सोमवारी जोरदार हिंसाचार झाला.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशात दुरुस्ती करत १६ सप्टेंबरऐवजी २० सप्टेंबरपर्यंत १२ हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
या आदेशानंतर बंगळुरु-म्हैसूर मार्गावरील नाईस रोडवर आंदोलकांनी तामिळनाडू रजिस्ट्रेशनच्या दोन ट्रकना आग लावली. तामिळनाडूतही अशीच हिंसक प्रतिक्रिया उमटली. चेन्नईमध्ये कर्नाटकच्या नागरीकांवर झालेले हल्ले तसेच कर्नाटक परिवहन सेवेच्या बसची नासधूस केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक रक्षना वेदीके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंगळुरुमध्ये निदर्शने केली.
चेन्नईमध्ये कन्नड नागरीकाच्या मालकीच्या हॉटेलवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. न्यूवडलँड हॉटेलवर हल्ला करुन नासधूस करण्यात आली. लोखंडी सळया आणि काठयांचा वापर करुन हल्ला चढवण्यात आला.
बंगळुरु आणि म्हैसूरमध्ये तामिळनाडूची दुकाने आणि वाहनांवर हल्ले करुन आगी लावल्या.
कर्नाटकने तामिळनाडूमध्ये तूर्तास बस वाहतूक बंद केली, तामिळनाडूच्या वाहनांनी राज्यात प्रवेश करुन यासाठी सीमेवर पोलिस तैनात.
बंगळुरुमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद, मेट्रो सेवाही २० मिनिटासाठी बंद करण्यात आली होती.
तामिळनाडूत चेन्नईमध्ये कर्नाटक कंपनीच्या न्यू वुडलँड हॉटेलवर हल्ला.
तामिळनाडूत रामेश्वरममध्ये कर्नाटकच्या पाच टुरिस्ट वाहनांची नासधूस करण्यात आली यात दोन बसचा समावेश.
Pro-Kannada activists set a vehicle on fire in Bengaluru during Protest over Cauvery water issue pic.twitter.com/ne7lFzpJW1
— ANI (@ANI_news) September 12, 2016