देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-१
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:00+5:302015-02-21T00:50:00+5:30
देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-१
द शाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे जात निर्मूलनासाठी आंदोलन : प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकले नागपूर : बंधुभावाची भावना ही जोपर्यंत जातीच्या पलीकडे जाणार नाही, तोपर्यंत भारतातील लोक एकत्र राहूच शकत नाही, हे वास्तव आहे. तेव्हा देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या देशातील जाती नष्ट झाल्याच पाहिजे. ते केवळ बोलून होणार नाही, तर त्यासाठी जाती मुक्ती आंदोलनाची लढाई लढावी लागेल, असे जाहीर आवाहन करीत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे जाती मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात जाती मुक्ती आंदोलनाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मुख्य निमंत्रक म्हणून ते बोलत होते. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. विचारवंत हनुमंतराव उपरे, डॉ. भारत पाटणकर, भीमराव बन्सोड, डॉ. गेल ऑम्वेट, ॲड. अनिल काळे, राजू लोखंडे, हरेंद्र श्रीवास्तव डॉ. संदीप नंदेश्वर, विनोद गजभिये, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य घटनेप्रमाणे प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संघटना उभी करण्याचाही अधिकार आहे. परंतु हे सर्व लोकशाहीच्या चौकटीत राहून असेल तर शांततेच्या मार्गाने सुरू आहे, असे म्हणता येते. परंतु धर्माच्या प्रचार प्रसाराच्या नावावर काही संघटना देशात हिंसाचार घडवितात. अशा संघटनांबाबत नागरिकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण अशा धर्मांध संघटनांच्याविरोधात काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या वाळीत टाकले आहे. परंतु हे काम केवळ राजकीय पक्षांनी घेऊन होणार नाही, यासाठी लोकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु जातीव्यवस्थेमध्ये अडकल्याने नागरिकांना यासंबंधात योग्य निर्णय घेता येत नाही, त्यामुळे जाती निर्मूलनाचे आंदोलन हे महत्त्वाचे ठरते. भारताच्या राजकीय गुलामगिरीचे कारण हे मुळातच या देशातील जातीव्यवस्थेमध्ये आहे. तेव्हा राष्ट्र उभारणी करणाऱ्या संघटना ज्या सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याच्या गोष्टी करीत आहेत. त्यातून देशात पुन्हा गुलामगिरी येणार नाही का, असा चिमटाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काढला.