काँग्रेस संघाविरुद्ध उघडणार मोहीम

By Admin | Updated: September 6, 2016 03:57 IST2016-09-06T03:57:54+5:302016-09-06T03:57:54+5:30

महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे.

Campaign to open against Congress | काँग्रेस संघाविरुद्ध उघडणार मोहीम

काँग्रेस संघाविरुद्ध उघडणार मोहीम

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे. जेणेकरून संघाचा खरा चेहरा उघडा करता येईल.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केल्यानंतर कठोर भूमिका घेत आपले वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, नथुराम गोडसे संघ आणि हिंदू महासभा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा होता, हे ऐतिहासिक तथ्य खरे नाही, हे सरसंघचालकांना कोर्टात येऊन सिद्ध करावे, यासाठी जोरदार आग्रह धरण्यात येईल.
कपिल सिब्बल यांनी याच आधारावर हा मुद्दा कोर्टात मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राहुल यांच्या विशेष चमूने ऐतिहासिक तथ्य शोधून याची माहिती राहुल यांना दिली. त्यानंतर काँग्रेस या प्रकरणात संघाविरुद्ध जोरदार मोहीम उघडणार असल्याचे संकेत मिळाले. दुसरीकडे, राहुल यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रदेश शाखांनाही संघाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. जेणेकरून संघाविरुद्ध लोकांना जागृत
करून संघाचा असली चेहरा जनतेसमोर उघडा पाडता येईल. हा अब्रुनुकसानीचा दावा राजकीय
मार्गाने लढण्याची काँग्रेसची इच्छा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेश आणि पंजाबात होणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल.
सत्य काय आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अन्य
वरिष्ठ नेत्यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मिळावी,
अशी मागणी कपिल सिब्बल
पुढच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाकडे करतील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. गांधीजींच्या हत्येतील संघाची भूमिका न्यायालयात आणि जनतेत उघड करण्यासाठी राजेश कुंटे यांनाही उलटतपासणीसाठी बोलावण्याची सिब्बल मागणी करतील.
आपण कोर्टात उपरोक्त मागणी करणार आहोत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांनुसार गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका होती; परंतु संघ आणि कोणाकडूनही आजवर सवाल उपस्थित का करण्यात आला नाही, असा सवाल करून, या पुस्तकातील उतारे पुरावे म्हणून कोर्टात सादर करणार असल्याचे अ‍ॅड. सिब्बल यांंनी सांगितले.
>‘तो’ पत्रव्यवहारही सादर करणार
सिब्बल हे जवळपास बारा पुस्तकांतील या मुद्द्याांशी संबंधित उतारे कोर्टात सादर करण्याच्या तयारीत आहेत, तसेच गांधीजींच्या हत्येनंतर नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात संघाबाबत झालेला पत्रव्यवहारही सादर करणार आहेत, असे सिब्बल यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. गांधी हत्येनंतर संघाने मिठाई वाटली, असा उल्लेख असलेले पत्र सरदार पटेल यांनी तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर यांना लिहिले होते, त्याबाबतही कोर्टाला माहिती दिली जाईल.

Web Title: Campaign to open against Congress