निर्दोष सुटलेल्या सहा आरोपींना दणका
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:06+5:302015-02-13T00:38:06+5:30
हायकोर्ट : तत्काळ अटक करण्याचे निर्देश

निर्दोष सुटलेल्या सहा आरोपींना दणका
ह यकोर्ट : तत्काळ अटक करण्याचे निर्देशनागपूर : सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या हत्याप्रकरणातील सहा आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. सुनील पटेल (३०), मुकेश मंडपे (३३), लक्ष्मी सोनी (३६), राजू सोनी (४१), नागेश शाहू (२०) व प्रवीण गुजर (३२) अशी आरोपींची नावे असून ते तकिया येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव शेख इसराईल शेख रज्जाक होते. २९ सप्टेंबर २०१४ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांनी तक्रार विलंबाने नोंदविण्यात आली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयान संशयास्पद आहे इत्यादी निष्कर्ष नोंदवून आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी मांडलेले सबळ मुद्दे विचारात घेता अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून सर्व आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केला. आरोपींना जामीन हवा असल्यास त्यावर उच्च न्यायालयातच निर्णय देण्यात येईल असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.ही घटना २० जून २०१३ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली होती. आरोपी सुनील, मुकेश व राजू दारू पित होते. दरम्यान, शेख इसराईलसोबत त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. उर्वरित आरोपीही भांडणात सहभागी झाले. यानंतर त्यांनी धारदार शस्त्रांनी शेख इसराईलची हत्या केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले होते. धंतोली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, १४३, १०९ इत्यादी कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले आहे.