-राकेश जोशीबदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावर पुन्हा लक्ष केंद्रित करताना २०२५-२६ साठी अर्थसंकल्पात ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भांडवली खर्चासाठी एकूण १.९२ कोटी राखीव ठेवले आहेत. ज्यात नवीन शस्त्रे, विमाने, युद्धनौका आणि इतर लष्करी उपकरणे खरेदी करणे आदींचा समावेश आहे.
२०२४-२५ मध्ये भांडवली खर्च १.७२ लाख कोटी होता. सुधारित अंदाजानुसार ही रक्कम १.५९ कोटी रुपये आहे. युद्धाचे स्वरूप बदलत असल्याने सैन्य दलांना आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करणे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि लढाऊ बनविण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे.
संरक्षण क्षेत्रासाठी मेक इन इंडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०२४ मध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादन मूल्य १.२६ लाख कोटी नोंदवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.
स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यावर भर
संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवोपक्रम, उद्योजकता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४५० कोटी रुपये देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. ही रक्कम आयडेक्स (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोपक्रम) आणि एडीआयटीआय (नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा सक्रिय विकास) या योजनांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.