एअर इंडियाच्या विमान अपघातात २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानातून प्रवास करणारे सर्वच्या सर्व कुटुंब देखील संपले आहे. यामुळे विमा कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण विमाधारकासोबत त्यांनी दिलेल्या नॉमिनींचा देखील यात मृत्यू झाला आहे. यामुळे अशावेळी निर्माण होणारी गुंतागुंत कशी सोडवायची याच्या विवंचनेत या विमा कंपन्या आहेत.
अहमदाबाद विमानतळाबाहेर झालेल्या या विमान अपघातात विमानातील २४१ तर घटनास्थळावरील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६० परदेशी नागरिक आहेत. परंतू, जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत.
इरडाने विमा कंपन्यांना या मृतांची नावे आपल्या डेटाशी जुळवून विम्याची रक्कम लगेचच द्यावी असे आदेश दिले आहेत. विमा कंपन्या देखील तयार आहेत परंतू त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. कारण या अपघातात पतीची विमा पॉलिसी असेल तर त्याची नॉमिनी पत्नी देखील मृत झालेली आहे. तसेच काहींची पत्नी व मुले देखील मृत झालेली आहेत. अशावेळी एक दीर्घ प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे विमा क्लेम सेटलमेंटला वेळ लागण्याची शक्यता आहे.
एलआयसीचे अधिकारी आशिष शुक्ला यांच्यानुसार कंपनीला आतापर्यंत १० दावे प्राप्त झाले आहेत. त्यात असा एक दावा आहे ज्यात नॉमिनी असलेल्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे. जर विमाधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला असेल, तर आम्ही 'क्लास वन' वारसांची तपासणी करतो, जसे की त्यांची मुले. जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकाने परस्पर संमती पत्र द्यावे लागते आणि कंपनीला नुकसानभरपाईचा बाँड सादर करावा लागतो.
अशाच प्रकारचा दावा इफ्को टोकियो, टाटा एआयजीला देखील मिळाला आहे. या कंपन्यांना इरडाचे स्पष्ट आदेश आहेत. कोणाचा दावा फेटाळायचा नाहीय की विलंबही करायचा नाहीय. यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी अहमदाबादमध्ये हेल्प सेंटर उघडले आहेत. त्याद्वारे हे विम्याचे दावे सोडविले जात आहेत. परंतू, ही प्रक्रिया पार पाडायची असेल तर काही दाव्यांना विलंब होणार आहे.