यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे. कारणही तसेच आहे. या निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटीं खर्च करण्यात आले आहेत. यापैकी जवळपास 45 टक्के म्हणजेच 27 हजार कोटींची रक्कम ही एकट्या भाजपाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी ही शक्यता वर्तविली आहे. सर्व भ्रष्टाचाराची जननी ही या निवडणुकीच्या खर्चामध्ये आहे. जर आपण हे मूळ शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार संपवू शकणार नाही. खर्चाच्या या वाढत्या प्रमाणाने आम्हाला घाबरवावे आणि एक मजबूत लोकशाही तयार करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलण्याविषयी उद्युक्त करावे, असे ते म्हणाले.
हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषन करण्यात आले आहे. यानुसार एका मतदारासाठी 700 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच 12 ते 15 हजार कोटी रुपये थेच मतदात्यांना वाटण्यात आले, तर 20 ते 25 हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी 5 हजार कोटी, औपचारिक खर्च 10 ते 12 कोटी आणि अन्य खर्चासाठी 3 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्य़ात येत असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.