भोपाळ - केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे हे देशद्रोहापेक्षा कमी नाही अशा शब्दात नड्डा यांनी निशाणा साधला. मध्य प्रदेशात भारत-पाकिस्तान सीजफायरवर राहुल गांधी यांनी जे विधान केले त्यावरून नड्डा यांनी पलटवार केला. राहुल गांधी यांच्या विधानावरून सत्ताधारी भाजपा नेते संतापले आहेत.
जे.पी.नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाला सरेंडर शब्द वापरणे हे दुर्दैवी आहे. भारतीय सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा हा घोर अपमान आहे. जर एखादा पाकिस्तानी असं बोलला असता तर आम्ही त्याच्यावर हसलो असतो परंतु ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानात खळबळ माजली, त्यानंतर पाकिस्तानी जनतेपासून त्यांचे सैन्य, सरकार आणि त्यांच्या पंतप्रधानांनीही हे बोलण्याची हिंमत केली नाही. परंतु राहुल गांधी जे बोलतायेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले. पाकिस्तान जगाला रडत रडत भारतीय सैन्याने पाकमध्ये १८ ठिकाणी हल्ला केला, त्यात सर्व उद्ध्वस्त झाल्याचे सांगतोय आणि राहुल गांधी देशात सरेंडर केल्याची गोष्ट करतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची घोषणा कुठल्याही भाजपा प्रवक्त्याने केली नाही हे राहुल गांधींना कळायला हवे होते. भारतीय सैन्याने हा पराक्रम जगासमोर सांगितला असंही जे.पी. नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांचे धोरण कायम सरेंडरचे राहिले आहे त्यांना दुसरे काही सुचणार नाही. राहुल गांधीजी सरेंडर तुम्ही करता, तुमच्या पक्षाने केले आहे. तुमच्या नेत्यांनी केले आहे कारण तुमचा इतिहास तोच आहे. भारत कधीही सरेंडर करत नाही. सरेंडर हा तुमच्या पक्षाच्या डिक्शनरीत आहे. तुमचा डीएनए आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारचा इतिहास आठवा त्यात तुम्ही सरेंडर केल्याचे दिसून येईल. तुम्ही दहशतवादासमोरही सरेंडर केले. १९७१ ची लढाई जिंकल्यानंतरही शिमला इथं टेबलवर सरेंडर केले. १९६२ च्या लढाईत सरेंडर केले. देशाच्या स्वातंत्र्यावेळी तुम्ही मुस्लीम लीगसमोरही सरेंडर केले असा घणाघात जे.पी. नड्डा यांनी केला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत-पाकिस्तान यांच्या सीजफायरवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा-आरएसएसची सरेंडरची सवय आहे. जर देशात काँग्रेस सरकार असते तर कधीही सरेंडर केले नसते. ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी तातडीने सरेंडर केले. भाजपा-आरएसएसचा स्वभावच कायम झुकण्याचा आहे. ट्रम्प यांनी मोदींना इशारा केला तर मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन केले असं त्यांनी म्हटलं.