गेल्या १० वर्षांपासून ओहोटी लागलेल्या काँग्रेस पक्षाचे यंदाच्या निवडणुकीत पार पतन झाले आहे. मध्य प्रदेशात तर अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली. गेल्या निवडणुकीत १२ जागांवर असलेला काँग्रेस पक्ष फक्त २ जागांवर विजयी झाला. गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया आणि छिंदवाडातून कमलनाथ यांनी लाज राखली नसती तर काँग्रेसचा सुपडाच साफ झाला असता. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री अरुण यादव यांचा खरगोन मतदारसंघातून दारुण पराभव झाला. माजी प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया, काँग्रेस नेते दिवंगत अर्जुनसिंह यांचे चिरंजीव अजयसिंह राहुल यांनादेखील मतदारांनी सतना मतदारसंघातून नाकारले. २००९ मध्ये भाजपाला २९ पैकी १६ जागा मिळाल्या होत्या. हा आकडा २७ च्या घरात पोहोचला आहे. भाजपाच्या सुमित्रा महाजन इंदूर मतदारसंघातून ४ लाख १७ हजार अशा सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार्या ठरल्या; तर त्यापाठोपाठ सुषमा स्वराज यांना विदिशातून ४ लाख ७ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पुन्हा फक्त एकच जागा जिंकता आली. गेल्या निवडणुकीतील कोरबा सीट काँग्रेसने यंदा गमावली असली तरी दुर्ग ही महत्त्वाची जागा मिळविली. दुर्ग मतदारसंघातून काँग्रेसचे ताम्रध्वज साहू जिंकले. महासमुंदमधून माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा पराभव झाला आहे. पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले मुख्यमंत्री रमणसिंह यांचे चिरंजीव अभिषेक सिंह हेदेखील राजनांदगाव मतदारसंघातून विजयी झाले. भाजपाला दहा जागांवर विजय मिळाला.
काँग्रेस पक्षाची अधोगती भाजपाची आघाडी!
By admin | Updated: May 17, 2014 04:38 IST