भाजपाला दिल्ली काबीज करण्याची संधी
By Admin | Updated: September 6, 2014 03:23 IST2014-09-06T03:23:16+5:302014-09-06T03:23:16+5:30
नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसताना देखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

भाजपाला दिल्ली काबीज करण्याची संधी
नायब राज्यपालांनी पाठविला राष्ट्रपतींना अहवाल
नवी दिल्ली : सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसताना देखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली.
जंग यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या अहवालात दिल्लीतील राजकीय परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले असून, दिल्लीत निर्वाचित सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या 49 दिवसांच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर येथे 17 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट आहे.
त्यानंतर कोणत्याही पक्षाने दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा केलेला नसला तरी विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाला निमंत्रण दिले जाऊ शकते. सर्व पर्यायांचा विचार करताना नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी निर्वाचित सरकारची शक्यता पडताळून बघायला हवी, असे नायब राज्यपालांनी म्हटले आहे.
सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळाल्यास पार्टी त्यावर विचार करेल, असे दिल्ली भाजपाप्रमुख सतीश उपाध्याय म्हणाले. दिल्लीत घटक पक्ष अकाली दलाचा एक मिळून भाजपाचे 29 आमदार आहेत. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला आणखी पाच आमदारांची आवश्यकता आहे. भाजपाने 7क् सदस्यांच्या विधानसभेत 31 जागा जिंकल्या होत्या. परंतु तीन आमदार हर्षवर्धन, रमेश बिधुडी आणि परवेश वर्मा हे लोकसभेत विजयी झाल्याने आमदारांची संख्या 28 झाली आहे. या तिघांनी राजीनामा दिल्यामुळे सभागृहात सदस्यांची संख्या 67 झाली आहे. त्यानुसार भाजपाला बहुमतासाठी आणखी पाच आमदारांची आवश्यकता आहे. आम आदमी पार्टीकडे 28 आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या आठ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते.
लवकरच निर्णय
दिल्लीत सरकार स्थापनेसंदर्भातील निर्णय भाजपा घेईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. भाजपाचे दिल्लीचे प्रभारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजनाथ यांच्याशी नॉर्थ ब्लॉक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही भूमिका मांडली.