उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. लखीमपूर खीरी येथील निघासन ढखेरवा मार्गावर हजारा फार्मजवळ भरधाव कार ऊस भरलेल्या ट्रॉलीवर आदळून हा अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार लखीमपूरमधील पटेलनगर येथे राहणारा दिग्विजय वाढदिवसाची पार्टी संपल्यावर मित्राला सोडण्यासाठी कारमधून ढखेरवा येथे जात होता. त्यादरम्यान हजारा फार्मजवळ ही भरधाव कार एका ऊस भरलेल्या ट्ऱॉलीवर आदळली. या अपघातात कारमधील सात जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
ही कार ज्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली त्या ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या. तसेच त्यापैकी एका ट्रॉलीचं चाक पंक्चर झालं होतं. हे चाक दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी भरधाव कार येऊन ट्रॉलीवर आदळली. या ट्रॉलीच्या मागे कुठलाही सांकेतिक रिफ्लेक्टर नव्हता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीचा अंदाज कारचालकासा आला नाही आणि हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.