उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील वैद्यकीय रुग्णालयात डायलेसिस दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय सरफराज डायलेसिससाठी आला, ते सुरू झालं पण मध्येच लाईट गेली. सरफराजला देण्यात येणारं अर्ध रक्त आधीच मशीनमध्ये होतं. सरफराजची आई कर्मचाऱ्यांसमोर विनवणी करत राहिली, मुलाला अस्वस्थ वाटत आहे, तो मरेल, जनरेटर चालू करा, परंतु कर्मचाऱ्यांनी डिझेल नसल्याचं सांगत नकार दिला आणि तरुणाचा मृत्यू झाला.
वैद्यकीय रुग्णालयाच्या डायलेसिस विभागात जेव्हा सरफराजची प्रकृती बिघडली, तेव्हा सलमा तेथे तपासणी करणाऱ्या सीडीओ पूर्णा बोरा यांच्याकडे धावली. त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सीपीआरसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत सरफराजचा मृत्यू झाला होता. आईच्या डोळ्यासमोरच लेकाचा तडफडून मृत्यू झाला. पूर्णा बोरा यांनाही धक्का बसला. सलमा यांनी रडत रडत तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती दिली.
सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा बरा होता आणि रुग्णालयात तो स्वतःहून आला आहे. एक वर्षापासून आजारी होता. पाच वेळा डायलेसिस केलं होतं. डायलेसिस सुरू झाल्यावर दोनदा लाईट गेली. तिसऱ्यांदा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लाईट गेली. याच दरम्यान सरफराजचा मृत्यू झाला. डायलेसिसचं काम संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवण्यात आलं आहे. यासाठी सरकार प्रति रुग्ण सुमारे १३०० रुपये देते. येथे दररोज २० रुग्णांचे डायलिसिस केले जाते. अशा परिस्थितीत कंपनीला एका महिन्यात १० लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जात आहेत. त्याच वेळी, एका वर्षात कंपनीला सुमारे एक कोटी रुपये देण्यात आले.
जिल्हा रुग्णालय बिजनोरमध्ये कार्यरत असलेले डायलेसिस सेंटर पीपी मोडवर एका खासगी एजन्सीला देण्यात आलं आहे, जे सेंटर सुरू आहेत, त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. स्वच्छतेचा अभाव, डॉक्टरांचा अभाव, टेक्निशियनचा अभाव, लाईट गेल्यावर जनरेटरसाठी डिझेलचा अभाव, ज्यामुळे अशा घटना घडत असल्याचं म्हटलं जात आहे.