बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, २४३ विधानसभा जागांपैकी जेडीयू आणि भाजप जवळजवळ समान जागांवर निवडणूक लढवतील. यात जेडीयूला १०२ ते १०३ आणि भाजपला १०१ ते १०२ जागा देण्याचे ठरले आहे. याशिवाय, एनडीएचे इतर मित्रपक्ष, चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला किती जागा द्यायच्या यासंदर्भातही फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने एनडीएमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे म्हटले आहे. यात नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपला समान जागा मिळणे अपेक्षित आहे. चिराग यांच्या एलजेपी (आर) चे बिहारमध्ये ५ खासदार आहेत, त्यांना २५-२८ जागा मिळू शकतात, तर ४० जागांचा दावा करणाऱ्या जीतन मांझी यांच्या एचएएमला ६-७ जागा मिळू शकतात. २०२० च्या निवडणुकीतही पक्षाने ७ जागांवर निवडणूक लढवली आणि ४ जागा जिंकल्या होत्या. तसेच, उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमला ४-५ जागा देण्याचे ठरले आहे.
या जागावाटपांअंतर्गत, एनडीएमधील घटक पक्षांना साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जागावाटप निश्चित मानले जाते परंतु त्याची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. जर आपण २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीबद्दल बोललो तर, त्यावेळी एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, एचएएम आणि मुकेश साहनी यांचे व्हीआयपी यांचा समावेश होता. त्यानंतर भाजपने ११०, जेडीयू ११५, एचएएम ७ आणि साहनी यांच्या पक्षाने ११ जागांवर निवडणूक लढवली. ज्यामध्ये भाजपने सर्वाधिक ७४ जागा जिंकल्या, जेडीयूने ४३, एचएएमने ४ आणि व्हीआयपीनेही ४ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, चिराग यांचा लोजपा (आर) स्वतंत्रपणे निवडणूक लढला होता. तर उपेंद्र कुशवाहच्या पक्षाने तिसरी आघाडी स्थापन केली. ज्यामध्ये बसपा, ओवेसीचा एआयएमआयएम यांचा समावेश होता. ज्यामध्ये कुशवाहाच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, एलजेपी (आर) ला एक जागा मिळाली, तर एआयएमआयएमने २० जागांवर निवडणूक लढवली आणि ५ जागा जिंकल्या. बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.