बंगळुरूच्या संघाची विजयी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. यानंतर बंगळुरू संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. पोस्टमॉर्टम न करता मुलाचा मृतदेह द्या अशी कळकळीची विनंती ते आता करत आहेत. मी मुलगा गमावला आहे. आता त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका असं ते सतत म्हणत आहेत. त्यांचं हे दु:ख पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
"माझा एकुलता एक मुलगा होता"
"मुलाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करू नका, त्याचा मृतदेह मला द्या, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका. तो माझा एकुलता एक मुलगा होता आणि आज मी त्याला गमावलं. तो मला न सांगता येथे आला होता. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे येतील, भेट देतील पण माझ्या मुलाचा जीव कोणीही परत आणू शकत नाही" असं वडिलांनी म्हटलं आहे.
"काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी हजारो लोक स्टेडियमच्या आत जमले होते. सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. परंतु काही लोकांनाच पास मिळाला आणि जेव्हा सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा गेट उघडताच मोठी गर्दी झाली. हजारो लोकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व दिशांनी लोक आत येऊ लागले. प्रवेशद्वाराचा रस्ता छोटा होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बॅरिकेड खाली पडले. काही वेळातच लोक त्याखाली दबले गेले आणि गर्दीने त्यांना चिरडलं. पोलिसांनी जखमी आणि बेशुद्ध लोकांना उपचारासाठी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं.