बारामुल्लात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद, अखेर चकमक थांबली

By Admin | Updated: October 3, 2016 07:41 IST2016-10-03T00:06:30+5:302016-10-03T07:41:30+5:30

सर्जिकल स्ट्राइकनंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्ला केला आहे.

Baramulla killed two terrorists, while a young martyr, finally the flick stopped | बारामुल्लात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद, अखेर चकमक थांबली

बारामुल्लात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद, अखेर चकमक थांबली

ऑनलाइन लोकमत

जम्मू-काश्मीर, दि. 03 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला (सर्जिकल स्ट्राईकला) काही दिवस उलटत नाहीत तोच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्करावर बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्ला केला. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफलच्या 46 या कॅम्पमधून थेट सार्वजनिक पार्कमध्ये प्रवेश केला होता. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेली जोरदार चकमक अखेर थांबली आहे. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त हाती येते आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यात तीन जवानही जखमी झाले असून, एक जवान शहीद झाला आहे. 
बारामुल्ला शहरापासून हा कॅम्प 54 किलोमीटर लांब आहे. येथे राष्ट्रीय रायफलच्या 46 बटालियनचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला अतिरेक्यांनी रात्री 10.30 वाजता लक्ष्य केले. दोन अतिरेकी या ठिकाणी आत्मघाती हल्ल्याच्या मनसुब्याने आले होते. मात्र, भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार केला. शिवाय धडक कृती दलाला आणि पोलिसांचे विशेष पथकही पाचारण करण्यात आले. 

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी लष्कराच्या जाबांझपोरा कॅम्पवर हल्ला केला आणि चकमक उशिरापर्यंत सुरू होती. कॅम्पजवळील काही घरांतूनही गोळीबाराचे आवाज येत होते. सर्जिकल स्ट्राईकनंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा तळांवर हल्ले होतील, असा इशारा गुप्तचारांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. तीनच दिवसांपूर्वी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सात दहशतवादी तळ नष्ट केले होते आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 15 दिवसांपूर्वी उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला होत. त्यात १९ जवान शहीद झाले होते. 

राजनाथ सिंह यांना दिली हल्ल्याची माहिती
बारामुल्लामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना बीएसएफच्या डीजींकडून देण्यात आली आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. अजित डोवल यांनी दहशतवादी हल्ल्याची इत्थंभूत माहिती घेऊन राजनाथ सिंह यांना दिली आहे. बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी शीघ्र कृती दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. भारतीय लष्करानं सर्व बाजूंनी नाकाबंदी केली आहे. मुजफ्फराबादला जाणारा महामार्गही बंद करण्यात आला आहे. सेनेच्या तुकडीनं चौकशी अभियानालाही सुरुवात केली आहे.

 

 

या हल्ल्याचा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी टागोर यांच्या 'स्वातंत्र्या'बाबतच्या शब्दांची आठवण करून दिली आहे. 

 

युद्धबंदीचे उल्लंघन
जम्मू जिल्ह्यातील पल्लनवाला क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानी सैन्याने रविवारी सायंकाळी पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय हद्दीत पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अधूनमधून गोळीबार सुरू होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title: Baramulla killed two terrorists, while a young martyr, finally the flick stopped