गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशाच्या काही नागरिकांनी बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करून त्याला बांगलादेशच्या सीमेमध्ये नेले. मात्र काही वेळाने या जवानाची सुटका करण्यात आली. पण या प्रकारामुळे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील वातावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बांगलादेशच्या सीमेवरून काही ग्रामस्थांनी बीएसएफच्या एका जवानाला बळजबरीने बांगलादेशच्या सीमेमध्ये नेल्याची आणि तिथे बांधून ठेवल्याची माहिती बीएसएफला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी माल्दा सीमेच्या दिशेने रवाना झाले. बांगलादेशमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या जवाना ओढत बांगलादेशमध्ये नेले होते, अशी माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली.
ही घटना सुइटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदनी चौक बॉर्डर आऊटपोस्टजवळ घडली. येथे बीएसएफच्या ७१ व्या बटालियनचे जवान श्री गणेश सीमेवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून तपासणी करत होते. सुरुवातीला श्री गणेश हे घुसखोरांचा पाठलाग करत चुकून बांगलादेशच्या सीमेमध्ये गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र ते भारताच्या हद्दीतच होते. तसेच त्यांना जबरदस्तीने बांगलादेशमध्ये खेचून नेण्यात आले, अशी माहिती नंतर समोर आली.