बांग्लादेशी घुसखोरांना परत जावेच लागेल - मोदी
By Admin | Updated: May 5, 2014 19:38 IST2014-05-04T14:14:56+5:302014-05-05T19:38:04+5:30
स्थानिक तरुणांचे रोजगार हिसकावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना भारतातून परत जावेच लागेल असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे.

बांग्लादेशी घुसखोरांना परत जावेच लागेल - मोदी
ऑनलाइन टीम
बंकुरा (प.बंगाल) , दि. ४ - स्थानिक तरुणांचे रोजगार हिसकावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना भारतातून परत जावेच लागेल असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. तसेच मोदींना कागदी वाघ म्हणणा-या ममता दिदींना निवणुडीकनंतर खरा वाघ कोण हे समजेल असे प्रत्युत्तर मोदींनी दिले आहे.
पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे नरेंद मोदींनी प्रचार सभा घेतली. आसाममधील हिंसाचारासाठी काँग्रेसने मोदींना जबाबदार ठरवले असतानाच मोदींनी पुन्हा एकदा बांग्लादेशींना लक्ष्य केले. मोदी म्हणाले, बांग्लादेशमधून धर्माच्या आधारे हुसकावून लावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आम्ही सामावून घेऊ, त्यांचे पूनर्वसन करु. मात्र स्थानिकांचे रोजगार हिरावून घेणा-या बांग्लादेशी घुसखोरांना आम्ही सामावून घेणार नाही. त्यांना बांग्लादेशमध्ये परतावेच लागेल असे मोदींनी सांगितले. काँग्रेस व अन्य पक्षांच्या व्होट बँकेच्या राजकारणासाठी या घुसखोरांची मदत केल्याचा आरोपही मोदींनी केला.
शनिवारी ममता बॅनर्जींनी मोदींना कागदी वाघ म्हणून संबोधित केले होते. यावरुनही मोदींनी वारंवार ममता दिदींना चिमटे काढले. ममता दिदी कागदी वाघाला का घाबरतात ?, निवडणुकीनंतर त्यांना खरा वाघ कोण हे समजेल असे त्यांनी सांगितले. तसेच 'ख-या वाघाने' गरिबांना लुबाडणा-या चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना तुरुंगात टाकले असते. पण स्वतःला वाघ म्हणवणारे या घोटाळ्याकडे नुसते बघत बसले असा टोला त्यांनी ममता दिदींना लगावला.