ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटाचा आरोप असलेले असीमानंद यांना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने आज जामीन मंजुर केला आहे.
२०१० साली अटक करण्यात आलेले असीमानंद सध्या जयपूरच्या अंबाला जेलमध्ये असून त्यांची आता जामीनावर मुक्तता करण्यात येणार आहे.
२००६ ते २००८ या दोन वर्षाच्या काळात समझौता एक्स्प्रेस , हैदराबादमधील मक्का मशिद , अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये ११९ लोकांचा बळी गेला. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत हे संघाचे सरचिटणीस असताना असिमानंद, इंद्रेश कुमार आणि सुनील जोशी हे भेटायला गेले. त्यांनी काही तरी धमाका केला पाहिजे अशी कल्पना भागवत यांच्यासमोर मांडली आणि भागवतांनी त्याला संमतीही दिली. त्यानुसार मग स्फोट घडवले गेल्याचे असीमानंदने कॅरावानाच्या मुलाखतीत म्हटले असा दावा करण्यात आला त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानुसार असिमानंद यांच्यावर कारवाई करीत त्यांना अटक करण्यात आली.