Nagpur Latest News: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये १७ मार्च रोजी हिंसेचा भडका उडाला. यात वाहनांचे आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. नागपुरातील हिंसाचारानंतर धरपकड सुरू असून, या घटनेला मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचे दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची विधाने बघा. सरकारचं चिथावणी देत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीत असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा
"मागील काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत. ते बघण्याची गरज आहे. सगळ्यात मोठी चिथावणी तर सत्तेकडून आहे. सरकारच चिथावणीखोर विधाने करत आहे. तुम्ही मागील चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा."
फोटो जाळून प्रतिक्रिया न उमटल्याने तुम्हाला त्रास झाला -ओवेसी
"चिथावणी यांनीच दिली आणि त्यांना याचंही भान नाही की ते मंत्री आहेत... मुख्यमंत्री आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्यातरी बादशाहाचे फोटो महाराष्ट्रात जाळले. कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही काय केलं की, कुराणातील आयत आहेत, जी एका कपड्यावर लिहिली जातात. ते तुम्ही जाळले. त्यावेळी तेथील मुस्लीम आणि हिंदू लोकांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. हे थांबवा. ते कापड जाळू नका, सांगितले. पण कारवाई केली गेली नाही.
संविधानाची शपथ घेतलीये ना, चिथावणीखोर विधाने का करता?
"संध्याकाळी या गोष्टी घडल्या. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण, तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित बघा. जी विधाने मंत्र्यांनी दिली आहेत. आताही दिले जात आहेत. तुम्ही कायद्याचे अनुकरण करा ना. तुम्ही तर भारतीय संविधानाचा शपथ घेतली आहे. मग तुम्ही चिथावणीखोर विधाने का करत आहात?", असा सवाल ओवेसींनी केला.
"मला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. तुम्हाला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. मग कुणीही कायदा हातात घेऊन नावडत सांगणार का? हे बघण्याची गरज आहे. हे चुकीचे घडत आहे. सरकारची चूक आहे. गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे", असा ठपका ओवेसींनी ठेवला.
ओवेसी म्हणाले, "तुमची विचारधारा बाजूला ठेवा आणि..."
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. हा जो हिंसाचार झालाय आहे, तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झाला आहे. हे खूप चुकीचे घडत आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे, ती बाजूला ठेवा. तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन करणे. ६ डिसेंबर १९९२ ला काय घडलं? त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला अग्रीगेस अॅक्ट म्हटले. तर तुम्ही बघा. सत्ता तुमची आहे. मंत्री तुमचे आहे. कायद्याची पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे", असे उत्तर असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.