नोटाबंदी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - अरविंद केजरीवाल
By Admin | Updated: November 17, 2016 14:48 IST2016-11-17T14:48:58+5:302016-11-17T14:48:58+5:30
दिल्लीच्या आजादपूरमध्ये केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त जनसभा घेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला.

नोटाबंदी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - अरविंद केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करणे हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीच्या आजादपूरमध्ये केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त जनसभा घेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला.
५०० आणि १ हजारच्या नोटेची जागा २ हजारची नोट घेणार त्यामुळे भ्रष्टाचार कसा कमी होणार ? २००० रुपयाची नोट काळा पैसा कसा संपवणार ? मी आयकर आयुक्त होते मलाही थोडेफार कळते असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. सरकारने कोणालाही थांगपत्ता लागू न देता विजय मल्ल्याला देशाबाहेर पळून जायला मदत केली असा आरोप अरविंद केजरीवालांनी केला.
नरेंद्र मोदी प्रामाणिक आहेत असे माझे मत होते मात्र मागच्या काही दिवसात वर्तमानपत्र वाचून मला धक्का बसला असे केजरीवाल म्हणाले. अंबानी आणि अदानींना मी बँकेच्या रांगेत उभे असल्याचे पाहिले नाही, भ्रष्टाचार अजूनही सुरुच आहे असे केजरीवाल म्हणाले. जेव्हा लोक रॉबर्ट वड्राबद्दल बोलायला घाबरत होते तेव्हा आम्ही त्यांचा भ्रष्टाचार उघड केला असे केजरीवालांनी सांगितले. मी शुगरचा रुग्ण आहे तरी, भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्यासाठी दोनवेळा उपोषणाला बसलो असे त्यांनी सांगितले.