अरुण शौरींचे मोदी सरकारवर टीकास्त्र
By Admin | Updated: May 2, 2015 19:07 IST2015-05-02T10:56:38+5:302015-05-02T19:07:38+5:30
वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रीपद भूषवणा-या अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

अरुण शौरींचे मोदी सरकारवर टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रीपद भूषवणा-या अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे तिघेच आज भाजपा चालवत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी एका मुलाखती दरम्यान केली आहे. या तिघांनी वेळोवळी विरोधकांचा उपमर्द तर केलाच पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केल्याचा आरोप शौरी यांनी केला आहे. योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याने आवश्यक तिथे बदल होत नाहीत, असे मत त्यांनी नोंदवले. तसेच मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळण्यात आलेलं नाही, असही शौरी म्हणाले.
लव्ह जिहाद, घरवापसी यांसारखे उपक्रम किंवा पक्षातील वाचाळ नेत्यांची वक्तव्ये या मुद्यांवर मोदींच्या मौनामुळे समाजात चुकीचा समज पसरत असल्याचे शौरी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.