स्वातंत्र्य दिनासाठी देशभर चोख सुरक्षा
By Admin | Updated: August 15, 2015 01:49 IST2015-08-15T01:49:23+5:302015-08-15T01:49:23+5:30
अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची
स्वातंत्र्य दिनासाठी देशभर चोख सुरक्षा
नवी दिल्ली : अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला जात आहे. विशेषत: भाजपच्या कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने हल्ले हाणून पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून एअर इंडियाच्या दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण किंवा त्यात स्फोट घडविण्यासारखे प्रकार घडविले जाऊ शकतात, असे गुप्तचर सूत्रांनी म्हटले होते. अतिरेकी हवाई मार्गांचा अवलंब करू शकतात, पॅराग्लायडर्सचा वापर करून हल्ले घडविण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. घातपात घडवून व्हीआयपींना लक्ष्य केले जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. अल-काईदाने भारतीय उपखंडात कारवाया वाढविल्या असून ही अतिरेकी संघटना भारतावर हल्ले घडवू शकते, अशी माहिती एप्रिलमध्ये गुप्तचर सूत्रांनी मिळविली होती. अलीकडेच गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुरेशी खबरदारी घेतली जात असली तरी इंडियन मुजाहिदीनसारख्या पाकिस्तानी संघटनांकडून किंवा सिमीच्या जुन्या सदस्यांकडून हल्ल्यांचा धोका कमी झालेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)