अहमदाबाद - राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुदावता गावातील खुशबू कंवर तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती परंतु नियतीच्या मनात दुसरेच काही होते. खुशबू राजपुरोहित लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. परंतु अहमदाबाद विमान दुर्घटनेत तिचा बळी गेला. खुशबू बोलातरा जिल्ह्यातील अराबा दुदावता गावातील मदनसिंह राजपुरोहित यांची मुलगी आहे. १८ जानेवारीला तिचं खाराबैरा पुरोहितान लूणी रहिवासी मनफूल सिंह राजपुरोहित यांच्याशी लग्न झाले होते. व्हिसा आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करून खुशबू पहिल्यांदा पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती.
बुधवारी गावातून निघाली होती
खुशबू तिचे सासर लूणीहून बुधवारी अहमदाबादसाठी निघाली होती जेणेकरून गुरुवारी तिला फ्लाईट पकडता येईल. परंतु कुणी विचारही केला नसेल हा तिचा अखेरचा प्रवास ठरेल. एअर इंडिया प्लाइटने ती लंडनला जात होती. मात्र हे विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांतच खाली कोसळले आणि भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच खुशबूचे गाव आणि सासरी शोककळा पसरली. या दुर्घटनेमुळे खुशबूच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला.
खुशबूला सोडण्यासाठी तिचे वडील आणि काकाची मुले अहमदाबाद एअरपोर्टला आले होते. परंतु खुशबू ज्या विमानात बसली होती त्याचा अपघात झाला. सध्या खुशबूचे कुटुंब तिची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या अपघात कुणीही वाचण्याची शक्यता फारच कमी आहे असं अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यामुळे खुशबू राजपुरोहित हीदेखील दुर्घटनेत मृत पावल्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील ११ प्रवासी
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राजस्थानातील ११ प्रवासी होते. त्यात बांसवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. विमानात उदयपूर येथील मार्बल व्यावसायिकाचा मुलगा-मुलगी प्रवास करत होते. ते लंडनला फिरायला चालले होते. सोबत एकाच गावातील २ युवकांचा समावेश आहे जे लंडनमध्ये शेफचे काम करत होते. विमानात बीकानेर इथला एक युवकही प्रवास करत होता. बांसवाडा येथील एका कुटुंबातील आई वडील आणि त्यांची ३ मुले प्रवास करत होते.