Ahmedabad Plane Crash: भारतासाठी आजचा दिवस (१२ जून २०२५) काळा दिवस ठरला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात 230 प्रवाशांसह 12 क्रु मेंबर्स प्रवास करत होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या भीषण अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिवंत वाचण्याची शक्यता खूपच कमी: अहमदाबाद पोलिस आयुक्तमीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, अपघाताची तीव्रता पाहता कोणत्याही प्रवाशाची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. विमान निवासी भागात कोसळल्याने, काही स्थानिक लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे, त्यांचा जीव वाचणे कठीण आहे.
या अपघातानंतर अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. सशस्त्र दलाच्या तुकड्या तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय, सुरुवातीच्या मदत कार्यासाठी सशस्त्र दलांसह एनडीआरएफ आणि इतर एजन्सी देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी बोलून तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अहमदाबादमध्ये सर्व संबंधित एजन्सींना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
अपघात कसा झाला?एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)च्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-171 ने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.17 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये विमान कोसळले. विमानातील इंधन टाकी पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळे विमानाने तात्काळ पेट घेतला. अपघातावेळी विमानात 242 लोक होते. यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे.