Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद येथून लंडनसाठी निघाले होते. या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी इंडिया टुडेशी फोनवरून बोलताना याची माहिती दिली.
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
याशिवाय ५० जणांना उपचारासाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेघनगरच्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. विमानाचा काही भाग इंटर्न डॉक्टरांच्या वसतिगृहावर आदळल्याने काही वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पोलिस आयुक्त मलिक म्हणाले की, २०४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. २०४ मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी आणण्यात आले आहेत. हे सर्व लोक विमानात होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या वसतिगृहावर विमान कोसळले त्यामधील विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे, यामुळे विमानातील किती जण आणि बाहेरी किती जण आहेत याची माहिती मिळालेली नाही.
२४२ जण प्रवास करत होते
बोईंग 787 ड्रीमलायनर विमान (AI171) उड्डाणानंतर लगेचच कोसळले. विमानात २४२ जण होते, ज्यात दोन पायलटसह १० क्रू मेंबर्स होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी प्रास करत होते.