गुजरातमधीलअहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार तातडीने सक्रिय झाले आहे. या गंभीर घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पटेल यांनी मुख्य सचिव पंकज जोशी आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आदेश दिले, तसेच रुग्णालयांमध्ये उपचारांची सर्व व्यवस्था प्राधान्याने उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे ट्विट
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत म्हटले की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघाताने मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या विमान अपघाताच्या मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याशी संपर्क साधून एनडीआरएफ पथकांची आणि केंद्र सरकारची संपूर्ण मदत देण्याचे आश्वासन दिले आहे."
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला फोन!
या संपूर्ण प्रक्रियेसोबतच केंद्र सरकारदेखील राज्य सरकारच्या मदतीस धावून आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधत या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, एनडीआरएफ पथकांना तत्काळ घटनास्थळी पाठवले जावे, असे म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार या प्रकरणी सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा अपघात स्थळी पोहोचल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अधिकृत तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.