अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान काही मिनिटांत कोसळलं. बोईंग ७८७-८ विमानाने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १:३८ वाजता लंडनमधील गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केलं परंतु ५ मिनिटांतच ते अपघातग्रस्त झालं आणि एका निवासी भागात पडलं. विमानात २४२ लोक होते.
अपघातानंतर लगेचच खूप मोठा गोंधळ उडाला. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले. गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले पूनम पटेल म्हणाले की, "माझी वहिनी लंडनला जात होती. एका तासातच मला विमान अपघात झाल्याची बातमी समजली. म्हणूनच मी येथे आलो आहे. तिला बघायलाही अजून मिळालेलं नाही. त्यामुळे काही समजत नाही."
भावना पटेल यांनी "माझी बहीण लंडनला जात होती. तिची फ्लाईट दुपारी १.१० वाजता होती. याच फ्लाईटचा अपघात झाला." तसेच "माझा मुलगा लंच ब्रेक दरम्यान हॉस्टेलमध्ये गेला होता. तेव्हाच तिथे विमान कोसळलं. माझा मुलगा सुरक्षित आहे आणि मी त्याच्याशी बोललो आहे. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे" असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रमिला यांनी सांगितलं.
एअर इंडिया विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. "अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने धक्का बसला असून दुःखी आहे. हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकाबरोबर माझ्या संवेदना आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले
२४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमानअहमदाबाद विमानतळाबाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.