गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात तिन्ही पायलटनी आपले प्राण गमावले आहेत. विमानाने उड्डाण केले आणि पुढच्या ५९ सेकंदांत होत्याचे नव्हते झाले. पायलटकडे काय होतेय हे कळायच्या आतच काही करण्यासाठी केवळ एका मिनिटापेक्षाही कमी वेळ होता. पायलटला जर वेळ मिळाला असता तर कदाचित हा अपघात नाही पण तीव्रता तरी कमी करता आली असती. विमानाच्या तिन्ही पायलटकडे पुरेसा अनुभव होता. परंतू, त्यांना वेळच मिळाला नाही.
विमानाचा अपघात कसा झाला याची चौकशी आता सुरु झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर सापडला आहे. त्यामध्ये या शेवटच्या काही सेकंदात विमानात काय झाले हे समजणार आहे. असे असले तरी विमानाच्या पायलटने काही चुकी केली का हे देखील तपासले जाणार आहे. परंतू,समोर आलेल्या माहितीनुसार विमानात जे कॅप्टन होते त्यांना विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांच्यासोबत असलेल्या पायलटकडे त्यांच्या वयानुसार पुरेसा अनुभव होता.
कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे थोडाथोडका नाही 8,200 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. एअरबस ए३१०, बोईंग ७७७ आणि बी७८७ सारखी विमाने त्यांनी चालविली होती. सह-पायलट क्लाईव्ह कुंदर यांना १,१०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. व्यावसायिक विमान उडविण्यासाठी किमान १,५०० तासांचा अनुभव आवश्यक असतो.
महत्वाचे म्हणजे सबरवाल येत्या काही महिन्यांतच निवृत्त होणार होते. त्यांनी आपल्या ८८ वर्षांच्या वडिलांना त्यांची काळजी घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. सबरवाल यांचे वडील एकटेच घरी राहतात. सबरवाल यांची बहीण दिल्लीत असते. तिला दोन मुले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच तिने अहमदाबादला न जाता मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारण वडील एकटेच होते आणि सुमित सबरवाल यांच्या लंडनला पोहोचण्याच्या फोनची वाट पाहत होते.