नवे सरकार आल्यानंतर रशियाशी प्रथमच चर्चा
By Admin | Updated: June 19, 2014 03:53 IST2014-06-19T03:50:27+5:302014-06-19T03:53:52+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली.

नवे सरकार आल्यानंतर रशियाशी प्रथमच चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार व ऊर्जा सुरक्षेच्या मुद्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर बोलणी करण्यात आली. रोगोजिन दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी येथे आले होते. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती पुतीन यांच्यादरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनाच्या तयारीवरही स्वराज व रोगोजिन यांनी बोलणी केली.
आर्थिक सहकार्य, ऊर्जा सुरक्षितता व कुडनकुलम विद्युत प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या रिअॅक्टरच्या संचालनावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
सैद्धांतिक रूपाने रशियाने भारताच्या अण्वस्त्र जबाबदारी कायद्याकरिता सहमती दर्शविली असून, यामुळे या प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या समझोत्यावर हस्ताक्षराचे मार्ग खुले झाले आहेत.
रशियाचे उपपंतप्रधान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. तसेच संरक्षणमंत्री अरुण जेटली व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याही भेटीचा कार्यक्रम त्यांनी निश्चित केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)