अहमदाबाद विमान अपघातानंतर आता दुबईहून जयपूरला येणारं एअर इंडियाचं विमान ५ तास उशिराने उड्डाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात हा विलंब झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दुबई विमानतळावर विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली.
सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. विमानातील एका प्रवाशाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX १९६ मधील प्रवाशांना पाच तास एसीशिवाय बसून ठेवण्यात आलं होतं. या काळात विमानात उपस्थित असलेल्या वृद्ध आणि मुलांची तब्येत बिघडली. ही घटना १३ जूनच्या रात्री घडली आहे.
मुलं रडू लागली, वृद्धांची तब्येत बिघडली
दुबईहून जयपूरला येणारी एअर इंडिया एक्सप्रेसची इंटरनॅशनल फ्लाईट IX १९६ ७:२५ वाजता दुबईहून निघणार होतं, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्याचं उड्डाण अनेक तास उशिरा झालं. अखेर विमान १२:४५ वाजता दुबईहून जयपूरला निघालं, परंतु त्यापूर्वी प्रवाशांना सुमारे ५ तास एसीशिवाय विमानात बसवून ठेवण्यात आलं. या काळात विमानात प्रचंड उष्णता होती आणि त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची प्रकृती बिघडली.
प्रवाशांनी केले गंभीर आरोप
प्रवाशांनी एअरलाईन्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, या काळात त्यांना साधं पाणीही देण्यात आलं नाही किंवा उशीर होत असल्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
प्रवाशांनी सांगितलं की, आम्ही ५ तास पंखा आणि एसीशिवाय भीषण गरमीमध्ये विमानात बसलो होतो. याच दरम्यान मुलं रडत होती आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ही बाब आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानातील लोक गरमीमुळे हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते पेपरने वारा घालताना दिसत आहेत.