अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह करून सुखी स्वप्नं रंगवणाऱ्या एका जोडप्याच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट झाल्याची घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यात घडली आहे. येथील भोजहा गावातील प्रभात कुमार आणि त्याची पत्नी निभा यांच्या प्रेमकहाणीची कौटुंबिक वादामुळे दु:खद अखेर झाली. प्रभात कुमार आणि निभा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र त्यांच्या प्रेमाला कौटुंबिक वादांचं ग्रहण लागलं. त्यातूनच प्रभात याने सोमवारी ट्रेनसमोर उडी मारून आपल्या जीवनाचा शेवट केला. प्रभात याच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नी निभा हिनेही विषारी पदार्थाचं प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रभात आणि निभा यांची प्रेमकहाणी दीड वर्षांपूर्वी सुरू झाली होती. व्हिडीओ रेकॉर्डिंगचं काम करणारा प्रभात आणि निभा यांची ओळख एका विवाह सोहळ्यात झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र प्रभातची आई आणि बहीण या लग्नावरून नाराज होती. त्यावरून कुटुंबात सतत वाद व्हायचे. सोमवारीसुद्धा प्रभातचा आई आणि बहिणीसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो रागाच्या भरात रेल्वेच्या रुळांच्या दिशेने गेला आणि तिथे भरधाव ट्रेनसमोर उडी मारून त्याने जीवन संपवलं.
जमुई रेल्वे स्टेशनजवळ रुळांवर मृतदेह पडलेला असल्याचे समजल्यावर खळबळ उडाली. अखेरीस हा मृतदेह प्रभात कुमार असल्याचे मृतदेहाजवळ असलेल्या मोबाईलवरून निष्पन्न झाले. ही बातमी प्रभातच्या कुटुंबाला समजताच त्याच्या पत्नीला धक्का बसला. चार महिन्यांची गर्भवती असलेल्या निभा हिनेही पतीचा विरह सहन न झाल्याने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.