90 टक्के भारतीय संगणक वापरकर्त्यांना पाठवता येत नाही ई-मेल
By Admin | Updated: April 26, 2016 14:20 IST2016-04-26T13:42:10+5:302016-04-26T14:20:52+5:30
देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते, तर 12 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे

90 टक्के भारतीय संगणक वापरकर्त्यांना पाठवता येत नाही ई-मेल
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 26 - एकीकडे केंद्र सरकार डिजीटल इंडिया कॅम्पेनवर लक्ष केंद्रीत करत असताना भारतातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूपच कमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संगणक वापरकर्त्यांच्या साक्षरतेसंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते. तर फक्त 12.4 टक्के लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे. इतर लोकांना मेल कसा पाठवायचा ? किंवा तो कसा तयार करायचा ? याची काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने हा अहवाल प्रसिद्द केला आहे. अहवालानुसार शहरांशी तुलना करता ग्रामीण भागातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागात फक्त 7.8 टक्के लोक संगणकाचा वापर करतात. शहरी भागातील परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा चांगली असून 28 टक्के लोकांना संगणकावरील वर्ड फाईलचं ज्ञान आहे.
अहवालानुसार फक्त 13.5 टक्के संगणक वापरकर्त्यांना इंटरनेटवर सर्च करता येतं. ग्रामीण भागात हे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशातील फक्त 12.4 टक्के लोकांना ईमेल पाठवण्याचं ज्ञान आहे. ग्रामीण भागात तर फक्त 6 टक्के लोकांना मेल कसा पाठवायचा हे माहित आहे. अहवालात तरुणांसंबंधी देण्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 14 ते 29 वयोगटातील फक्त 27.8 टक्के तरुणांना संगणक वापरता येतो. याचा अर्थ प्रत्येक तिसरा तरुण संगणक असाक्षर आहे. याचप्रमाणे 30 ते 45 वयोगटातील 90 टक्के लोक संगणक वापराबद्द्ल अनभिज्ञ आहेत.