अन्न सुरक्षेतून ८ हजार लोक बाद

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:15+5:302015-07-16T15:56:15+5:30

(लोकमत विशेष)

8 thousand people after food security | अन्न सुरक्षेतून ८ हजार लोक बाद

अन्न सुरक्षेतून ८ हजार लोक बाद

(ल
ोकमत विशेष)
१ ऑगस्टपासून मोहीम : २.५ लाख रेशनकार्डांची छाननी
अन्न सुरक्षेतून ८ हजार कुटुंबे अपात्र
सद्गुरू पाटील/पणजी :
सरकारच्या नागरी पुरवठा खात्याने येत्या दि. १ ऑगस्टपासून राज्यातील सुमारे अडीच लाख रेशनकार्डांची छाननी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसर्‍या बाजूने या खात्याने अन्न सुरक्षेसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींपैकी ८ हजार रेशनकार्डधारक कुटुंबांना या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरवले आहे. अशा प्रकारे आणखी १० ते १२ हजार कुटुंबे अर्जांच्या छाननीअंती अपात्र ठरणार आहेत.
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभासाठी एकूण १ लाख ४० हजार लोकांनी आतापर्यंत अर्ज केले. अजूनही अर्ज येणे सुरूच आहे. शनिवार व रविवारीही नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी तालुका पातळीवर अर्ज स्वीकारण्याचे काम करतात. सध्या १ लाख ४० हजार व्यक्तींचे अर्ज खात्याकडे आले. त्यापैकी ३० हजार अर्जांची छाननी करण्यात आली व त्यातून ८ हजार अर्ज हे अन्न सुरक्षेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले; कारण या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरण्याकरिता जी कागदपत्रे सादर करावी लागतात, ती कागदपत्रे हे आठ हजार अर्जदार सादर करू शकले नाहीत. येत्या ऑक्टोबरपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
श्रीमंतांना पीडीएसमधून वगळणार (चौकट)
पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या रेशनकार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून बाद ठरविले जाणार आहे. केंद्र सरकारने तशी भूमिका घेतली असून त्याची अंमलबजावणी गोव्यात नागरी पुरवठा खाते करणार आहे. पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न म्हणजेच दरमहा ४०-४१ हजारांची प्राप्ती असलेल्या रेशनकार्डधारकास सार्वजनिक वितरण व्यवस्थेपासून (पीडीएस) पूर्णपणे बाजूला ठेवले जाणार आहे. त्यामुळे सोसायट्यांना दिला जाणारा कोटाही कमी केला जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाच्या कक्षेबाहेर असलेल्या सुमारे अडीच लाख रेशनकार्डांची येत्या महिन्यात छाननी केली जाणार आहे. छाननीवेळी प्रत्येकाकडे आधारकार्ड मागितले जाईल. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांना निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना अशा बारापैकी एखादा पुरावा सादर करावा लागेल. यापैकी काहीच सादर न करणार्‍यांचे रेशनकार्ड रद्द केले जाईल. इतर सर्वांना नवी रेशनकार्डे दिली जाणार आहेत, असे संचालक विकास गावणेकर यांनी सांगितले.
राज्यात सध्या रेशनकार्डांची एकूण संख्या ४ लाख ३ हजार आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाच्या कक्षेत एकूण पाच लाख लोकसंख्या येते. गृह आधार, अंत्योदय अशा योजनेच्या लाभार्थींना आपोआप अन्न सुरक्षेचा लाभ मिळेल.

Web Title: 8 thousand people after food security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.