५६ आयएएसची ‘घर वापसी’ला पसंती
By Admin | Updated: July 11, 2015 00:26 IST2015-07-11T00:26:33+5:302015-07-11T00:26:33+5:30
आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत मोठे पद मिळविण्यासाठी अहमहमिका लागल्याचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच किमान

५६ आयएएसची ‘घर वापसी’ला पसंती
नवी दिल्ली : आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत मोठे पद मिळविण्यासाठी अहमहमिका लागल्याचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच किमान ५६ आयएएस अधिकाऱ्यांनी केंद्रातील पदे त्यागत आपापल्या राज्यातील कॅडरमध्ये परतण्याला पसंती दर्शविली आहे. त्यातील बहुतांश अधिकारी संयुक्त सचिव किंवा त्यावरील दर्जाचे आहेत.
आयएएस अधिकाऱ्यांनी केंद्रातून राज्यात चालविलेली ‘घर वापसी’ दुर्मिळ अशीच म्हणावी लागेल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) आपल्या वेबसाईटवर दिलेला तपशील बघता २०१३ मध्ये केवळ तीन अधिकाऱ्यांनी केंद्रातून राज्यांकडे धाव घेतली होती. आॅगस्ट ते डिसेंबर २०१२ या काळात एकमेव अधिकारी परतला होता. जानेवारी २०१४ ते मे १४ या काळात १३ अधिकाऱ्यांनी राज्यात बदली करवून घेतली. मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन मोदींकडे सत्ता आली. त्यानंतर अधिकाऱ्यांचा राज्याकडे परतण्याचा कल वाढू लागला, असेच आकडेवारी सांगते. या काळात केवळ चार अधिकारी केंद्रात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)