प्रशांत किशोर हरवल्याचे काँग्रेसनं लावले पोस्टर्स, शोधणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस
By Admin | Updated: March 19, 2017 19:06 IST2017-03-19T19:06:49+5:302017-03-19T19:06:49+5:30
रणनीतीकार प्रशांत किशोर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर गायब झाले

प्रशांत किशोर हरवल्याचे काँग्रेसनं लावले पोस्टर्स, शोधणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस
ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 19 - मोदींना 2014च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देणारे आणि बिहारची सत्ता नीतीश कुमारांकडेच राहील अशी रणनीती आखणारे रणनीतीकार प्रशांत किशोर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी चक्क काँग्रेसनं जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जो कोणी प्रशांत किशोर यांना शोधून देईल त्याला 5 लाखांचं बक्षिस देण्यात येईल, असं या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशमधील काँग्रेस समितीचे सचिव राजेश सिन्हांनीच त्यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. गेल्या वर्षभरापासून प्रशांत भूषण आम्हाला मूर्ख बनवतायत. आम्ही त्यांच्या सूचनांचे पालत करत असतानाही काँग्रेसचा दारुण पराभव का झाला याचे कार्यकर्त्यांना उत्तर हवे आहे, असा मजकूरही या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. मात्र राजेश सिंह यांनी लावलेल्या पोस्टर्सवर काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष राज बब्बर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पराभवाचे खापर दुसऱ्या व्यक्तीवर फोडणे अयोग्य असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांना राज बब्बर यांनी हे पोस्टर्स हटवण्याचे आदेशही दिले आहेत.
(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)
तत्पूर्वी काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवून देण्याची सर्व धुरा रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर टाकली होती. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी व्यापक रणनीती आखली होती. लखनऊमधल्या वॉर रूममध्ये काँग्रेसच्या विजयाची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रशांत किशोर टीमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक बुथवर जाऊन विश्लेषण केलं होतं. प्रत्येक बुथनुसार जातीयवाद आणि धार्मिक मतांचा आकडा तयार करण्यात आला आहे. तिकीटवाटपातही या मतांना डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारांना तिकीट देण्यात आलं होतं. प्रशांत किशोर यांची टीम 500 लोकांचं काम करत असल्याचीही चर्चा होती. मात्र आसामसारखी उत्तर प्रदेशातही प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल ठरल्यानं काँग्रेसच्या पदरी अपयश आलं आहे.