उत्तरप्रदेशमध्ये जनता एक्सप्रेसला अपघात, ३१ ठार
By Admin | Updated: March 20, 2015 18:58 IST2015-03-20T10:50:00+5:302015-03-20T18:58:46+5:30
उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे डेहराडून - वाराणसी जनता साधारण एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने ३१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

उत्तरप्रदेशमध्ये जनता एक्सप्रेसला अपघात, ३१ ठार
ऑनलाइन लोकमत
रायबरेली, दि. २० - उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे डेहराडून - वाराणसी जनता साधारण एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघातात सुमारे १५० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केंद्र सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी सकाळी जनता साधारण एक्सप्रेस बछरावा रेल्वे स्थानकाजवळ इंजिनच्या मागील दोन डबे रुळांवरुन घसरले. या एक्सप्रेसला बछरावा स्टेशनवर थांबा होता पण गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या ट्रेनचे चार डबे रुळांवरुन घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच मोटरमनने सिग्नल न बघितल्याने गाडी वेगात पुढे गेली व अपघात झाला अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. जखमींना लखनौ, रायबरेली व बछरावा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस व रेल्वेचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले असून रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला ५० हजार रुपये तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना २० हजार रुपयांची मदत रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाईकाना २ लाक रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.