चेंगराचेंगरीत २७ ठार
By Admin | Updated: July 15, 2015 00:13 IST2015-07-15T00:13:29+5:302015-07-15T00:13:29+5:30
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले.

चेंगराचेंगरीत २७ ठार
राजमुंद्री : आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
१२ वर्षांत एकदा आयोजित होणाऱ्या या धार्मिक महोत्सवाच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गोदावरी किनारी जमले होते. सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान स्नानासाठीच्या घाटावर ही दुर्दैवी घटना घडली. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले बहुतांश वयोवृद्ध होते. लांबचा प्रवास करून आल्याने ते थकलेले होते. श्वास गुदमरल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विजय रामराजू यांनी दिली. दरम्यान, सर्व मृतदेह राजमुंद्री सरकारी इस्पितळात आणण्यात आले असून जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे सुद्धा पुष्करमनिमित्त गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी आले होते. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ते स्वत: बचाव आणि मदत मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. पुढील ११ दिवस आपण येथेच मुक्कामी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेंगराचेंगरीपूर्वी नायडू, त्यांच्या पत्नी आणि मुलाने नदीत स्नान केले. नदीची पूजाअर्चा करून शंखनिनादाने १२ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा शुभारंभ केला.
मान्यवरांना शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चेंगराचेंगरीतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी राज्य सरकारला केले. (वृत्तसंस्था)