१८ वर्षांनी सापडला 'त्या' जवानाचा मृतदेह
By Admin | Updated: August 20, 2014 16:12 IST2014-08-20T16:11:57+5:302014-08-20T16:12:08+5:30
काश्मीरमधील सियाचीन येथील बर्फाच्छादित प्रदेशात बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा मृतदेह तब्बल १८ वर्षांनी सापडला असून बुधवारी त्या जवानाचे पार्थिव उत्तरप्रदेशमधील मूळगावी नेण्यात आले आहे.

१८ वर्षांनी सापडला 'त्या' जवानाचा मृतदेह
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि. २० - काश्मीरमधील सियाचीन येथील बर्फाच्छादित प्रदेशात बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा मृतदेह तब्बल १८ वर्षांनी सापडला असून बुधवारी त्या जवानाचे पार्थिव उत्तरप्रदेशमधील मूळगावी नेण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या १५ राजपूत रेजिमेंटमधील हवालदार गया प्रसाद हे १९९६ मध्ये सियाचीन येथे बेपत्ता झाले होते. सैन्याच्या जवानांनी त्यांचा शोधही घेतला पण यात त्यांना अपयश आले. गया प्रसाद हे मुळचे उत्तरप्रदेशमधील मणिपूरी येथील रहिवासी होते. गया प्रसाद यांचे मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला नव्हता. 'माझ्या मुलाचा मृत्यू झाला हे आम्हाला माहित होते. पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करता आले नाही याची खंत आम्हाला वाटत होती असे गया प्रसाद यांचे वृद्ध वडिल सांगतात. गया प्रसाद यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मुळगावी आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सियाचीनमध्ये पेट्रोलिंग करणा-या जवानांना बर्फात हात दिसला. या जवानांनी थोडे खणले असता बर्फाच्या खाली गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळील ओळखपत्रावरुन गया प्रसाद यांची ओळख पटली. बर्फाच्छादीत परिसर असल्याने मृतदेह दिर्घकाळ टिकून राहतात. या भागात अनेक जवानांचे मृतदेह आढळले आहेत असे सैन्यातील एका अधिका-याने सांगितले. गया प्रसाद यांच्या पश्चात पत्नी रमा देवी, मुलगा सतीश आणि मुलगी मीना आणि मंजू असा परिवार आहे.