१५ अतिरेक्यांना घातले कंठस्नान
By Admin | Updated: June 10, 2015 03:39 IST2015-06-10T03:39:50+5:302015-06-10T03:39:50+5:30
मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.

१५ अतिरेक्यांना घातले कंठस्नान
मणिपूर हल्ल्याला प्रत्युत्तर : भारतीय लष्कराची म्यानमार सीमेपार कारवाई
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. मणिपूरमधील हल्ल्यात सहभागी गट म्यानमारमध्ये दडून असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर ही मोहीम पार पाडण्यात आली.
म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती पुरविण्यात सहकार्य केले. एनएससीएन (के) व केवायकेएल या २ दहशतवादी गटांचा हल्ल्यात सहभाग होता. भारतीय लष्कराने एकही जवान न गमावता या दोन्ही गटांच्या १५ अतिरेक्यांचा खात्मा करीत मोहीम फत्ते केली. मणिपूरमधील हल्ल्यानंतर लष्कराला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आणखी हल्ले घडविले जाणारे असल्याची गुप्त माहिती मिळताच ही मोहीम हाती घेण्यात आली. भारत- म्यानमार सीमेवरील दोन स्थळांवर, नागालँड व मणिपूर सीमेवर तसेच म्यानमारमध्येही कारवाई करण्यात आली. त्यासाठी म्यानमारच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यात आला, असे अतिरिक्त संचालक मेजर जनरल रणबीरसिंग यांनी सांगितले.
प्रथमच भारतीय लष्कराने सीमापार धडक देत कमांडो मोहीम चोखपणे पार पाडली. दहशतवादाविरुद्ध ठोस कृतीचे ते निदर्शक ठरते. ईशान्येकडे दहशतवादी गटांनी हल्ल्यांची मालिकाच चालविल्याचे पाहता विशिष्ट अशा गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला. दहशतवाद्यांशी जोरदार धुमश्चक्री झाली. अतिरेक्यांनाच ठार मारण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याने नागरिकांची प्राणहानी टाळता आली. ४ जून रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. अतिरेकी सीमाभागात घुसखोरीनंतर हल्ले करून परतणार असल्याने त्यांना सीमेपलीकडे जाऊन मारणेच योग्य ठरले. म्यानमार आणि भारताच्या निकटस्थ सहकार्याचा एक इतिहास राहिला आहे. यापुढेही दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अशाच प्रकारे ठोस कृती केली जाईल, असेही जन. रणबीरसिंग म्हणाले. एनएससीएन(के) या अतिरेक्यांच्या गटाने मार्चमध्ये शस्त्रीसंधीतून माघार घेतल्यानंतर हल्ल्यांची मालिका घडवत धुमाकूळ चालविला होता. अन्य अतिरेकी गटांना ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ साऊथ इस्ट इंडिया’ या छत्राखाली एकजूट करीत या संघटनेने कारवायांना वेग दिला होता.
जशास तसे उत्तर
लगेच हल्ल्यांचा धोका लक्षात घेता तातडीने कारवाई आवश्यक होती. नियोजित हल्ले परतवून लावण्यासाठी ही मोहीम पार पाडण्यात आली. आपली सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर हल्ले केले जात असतील तर असेच ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. सीमा भाग आणि सीमेवरील राज्यांमध्ये शांतता आणि सलोखा राखण्याची हमी दिली जाईल.
- मेजर जनरल रणबीरसिंग (लष्करी मोहिमांचे
अतिरिक्त संचालक)