१२ नक्षलवाद्यांचा झारखंडमधील चकमकीत खात्मा
By Admin | Updated: June 10, 2015 00:14 IST2015-06-10T00:14:54+5:302015-06-10T00:14:54+5:30
झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
१२ नक्षलवाद्यांचा झारखंडमधील चकमकीत खात्मा
मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.
ही चकमक रात्री १२ वाजताच्या दरम्यान रांचीपासून १४० किमी अंतरावरील बकोरिया गावात झाली आणि सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मयूर पटेल यांनी दिली.
क्षेत्रीय कमांडर आर.के. ऊर्फ अनुराग ऊर्फ डॉक्टर याच्यासह सशस्त्र नक्षल गटाच्या उपक्षेत्रीय समितीचे आणखी दोन सदस्य चकमकीत ठार झाले असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हे फार मोठे यश असल्याचे सांगून ते म्हणाले की,चकमकीनंतर ८ ते १० अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
नक्षलवादी जिल्ह्यात गेले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर कोब्रा बटालियन आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षा जवानांना बघून नक्षलवादी गाड्यांमधून खाली उतरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. नक्षली दोन वाहनांमधून आले होते. एका वाहनातून नक्षल्यांनी पळ काढला.
(वृत्तसंस्था)