युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर
By Admin | Updated: August 9, 2015 23:12 IST2015-08-09T23:11:37+5:302015-08-09T23:12:04+5:30
युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर

युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर
नाशिक : पाश्चात्य संस्कृती ही भौतिकवादी असून, भारतीय संस्कृती ही अध्यात्मवादी आहे. युवकांनी एक उत्साह, ध्येय, नवीन आशा घेऊन भारतमातेची सेवा करायला हवी, असे मत विश्वास लपालकर यांनी नाशिक सिंधी सोशल ग्रुप नाशिक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा आयोजित व्याख्यानमालेत व्यक्त केले.
व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात ‘पुरब और पश्चिम स्वामी विवेकानंदजी के नजरोसे’ या विषयावर विश्वास लपालकर श्रोत्यांशी संवाद साधताना विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणांतून प्रेरणा दिली.
स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे नाते लोहचुंबकासारखे होते. विवेकानंदांनी संन्यास घेतल्यानंतर १८८८ साली कोलकाता येथून परिभ्रमणाला सुरुवात केली. संन्यास घेतल्यानंतर आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले होते. कोलकाता ते कन्याकुमारी असा प्रवास करताना विवेकानंदांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. केरळमध्ये गेल्यावर तेथील जातीय हिंसाचार पाहून विवेकानंद हतबल होत ‘मी जणू वेड्यांच्या इस्पितळात आलो’ असल्याची खंत व्यक्त केली होती. परिभ्रमण करताना १८९२ साली विवेकानंद कन्याकुमारीला पोहचले आणि समुद्रातील शिलालेखावर तीन दिवस तपश्चर्या करून उत्तरेकडे बघितले असता त्यांना परिभ्रमण करताना दिसलेली संपूर्ण भारतीय संस्कृती डोळ्यासमोर येऊ लागली आणि भारताला संघटन करण्याची गरज असल्याची जाणीव प्रकर्षाने जाणवल्याचे लपालकर यांनी यावेळी सांगितले.
याकाळात विवेकानंदांना भारतीय संस्कृती एका हाताने घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने पाश्चात्य संस्कृतीतून योग्य ते घेत जाण्याची क्लृप्ती अवगत झाल्याचेही लपालकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात आश्विनी बेदी आणि छाया फुकन यांनी विवेकानंद जीवन गीत गाऊन केली; तर सूत्रसंचालन हरिश गुरुनानी यांनी केले. यावेळी नरेश कारडा, वासुदेव ललवाणी, मधुकर देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)