अल्पवयीन मुली असुरक्षित
By Admin | Updated: June 9, 2014 01:00 IST2014-06-09T00:54:17+5:302014-06-09T01:00:14+5:30
विकृतीत वाढ : नात्याला फासला जातोय काळिमा; बालिकाही ठरताहेत शिकार

अल्पवयीन मुली असुरक्षित
नाशिक : शहरात गेल्या पाच महिन्यांत तब्बल १६ बलात्कार, तर ३७ विनयभंगाच्या घटना घडल्या असून, विशेष म्हणजे, नात्यालाच काळिमा फासण्याचे प्रकार यातून समोर आले आहेत. जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याच्या दोन घटनांही पुढे आल्या आहेत. परिणामी, शहरातील अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
या वर्षी गेल्या जानेवारी महिन्यात एक बलात्कार व सहा विनयभंगाच्या घटना घडल्या. फेबु्रवारीमध्ये एका बलात्कारासह सात विनयभंग, मार्चमध्ये पाच बलात्कार, दहा विनयभंग, एप्रिल महिन्यामध्ये तीन बलात्कार व ११ विनयभंग, तर मे महिन्यात सर्वाधिक पाच बलात्कार व १३ विनयभंगाचे गुन्हे घडले. सध्या सुरू असलेल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एक बलात्कार व तीन विनयभंगाच्या घटना घडून गेल्या आहेत. या सर्व घटनांमधील अधिकाधिक पीडित व्यक्ती या अल्पवयीन मुली आहेत़ एवढेच नव्हे, तर पीडितांमध्ये दोन बालिकांचाही समावेश आहे़ विनयभंगाच्या एकूण घटनांपैकी सहा महिला वगळल्यास उर्वरित सर्व अल्पवयीन मुलीच पीडित आहेत.
दरम्यान, पित्यानेच आपल्या १५ वर्षांआतील मुलीवर अत्याचार केल्याच्या शहरात घडलेल्या दोन घटना अवघ्या शहरवासीयांना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. याशिवाय सख्ख्या भावाने तीन मित्रांच्या सहाय्याने बहिणीवर बलात्कार केल्याची गंगापूर परिसरातील घटनाही घृणास्पद आहे. कामटवाडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ६२ वर्षीय वृद्ध नऊ महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करीत असल्याची घटनाही उघडकीस आली.
पेठ रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगत असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या तेरावर्षीय बालिकेवर एका उत्तर भारतीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली.
उपनगर येथील जयभवानी रोडवरील पाटोळे मळ्यात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला नात्यातीलच तीन युवकांनी पळवून नेल्याची घटना घडली. तरुणीचा विनयभंग करून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार गंगापूर नाक्यावर घडला. सिडकोच्या आझादनगर भागात चारवर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका २२ वर्षीय नराधमाने केला होता़
या सर्व घटनांत अल्पवयीन मुलीच पीडित ठरल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदि भागांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात निषेध व्यक्त करणाऱ्या महिला संघटना तथा तरुणाईने आपल्या स्वत:च्या शहरात घडणाऱ्या या घटनांबाबत मात्र साधलेली चुप्पी त्यांच्या सामाजिक जाणिवांवरच प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. (प्रतिनिधी)