महिला क्रिकेटला रसिकांची दाद
By Admin | Updated: July 3, 2017 00:57 IST2017-07-03T00:56:36+5:302017-07-03T00:57:47+5:30
नाशिक : महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करीत रसिकांच्या मनावर फुंकर घातली आहे.

महिला क्रिकेटला रसिकांची दाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केल्याची सल तमाम क्रिकेट रसिकांच्या मनात असतानाच भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करीत भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर फुंकर घातली आहे. उभयतांमधील हा सामना नाशिककरांनी टीव्हीवर पाहण्याचा आनंद लुटला. एकता बिस्टच्या गोलंदाजीने सामन्यात रंगत आणल्याने सारेच टीव्ही संचासमोर खिळून होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना दोन्ही देशांमध्ये मोठ्या उत्कंठेने पाहिला जातो. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून क्रिकेट सामन्यातील युद्ध म्हणूनच याकडे पाहिले जाते. मागील महिन्यात आशियाई स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचे पारडे जड असताना अंतिम सामन्यात मात्र भारताला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. क्रिकेट रसिकांनी टीव्ही संच फोडून राग व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्र्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळविला गेला. या सामन्याविषयी क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता होती. रविवारची सुटी असल्याने आणि शहरात पाऊस सुरू असल्यामुळे क्रिकेट रसिकांनी टीव्हीवर हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. घरातील सर्वांनीच सामन्याचा आनंद घेत महिला क्रिकेटच्या खेळाचे कौतुक केले. एरव्ही महिला क्रिकेटकडे कुणाचेही लक्ष जात नाही परंतु विश्वचषकातील हा सामना असल्यामुळे या सामन्याविषयी दोन दिवसांपासून चर्चा होतीच. भारताने पाकिस्तान महिला क्रिकेटचा पराभव करावा या अपेक्षेने टीव्हीसमोेर बसलेल्या प्रेक्षकांना भारतीय महिला क्रिकेटचा दर्जेदार खेळ बघायला मिळाला. काहीशा अवघड परिस्थितीतून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत भारतीय फलंदाजांनी मजल मारली तर गोलंदाजांनी पाकिस्तानचा अवघ्या ७५ धावांत धुव्वा उडविल्याने क्रिकेट रसिकांनी महिला क्रिकेटला दाद दिली. केवळ १८ धावांत ५ बळी घेणाऱ्या एकता बिस्टच्या फिरकीने क्रिकेट रसिकांना चांगलाच आनंद दिला.