महिला आरक्षणामुळे चित्र पालटणार
By Admin | Updated: January 8, 2017 00:46 IST2017-01-08T00:46:05+5:302017-01-08T00:46:05+5:30
घडामोडींना वेग : वणी गटात इच्छुकांची निराशा

महिला आरक्षणामुळे चित्र पालटणार
प्रवीण दोशी वणी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय आखाडा तयार झाला असून, वणी गट व गण महिला आरक्षित झाल्याने विद्यमानांचा हिरमोड झाला आहे. यामुळे दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी वरकरणी सुरू झाली आहे.
हक्काचा मतदारसंघ महिलांच्या ताब्यात गेल्याने राजकीय चित्र पूर्णत: बदलले आहे. वणी व लखमापूर अशा दोन गणांचा समावेश असलेल्या वणी गटावर शिवसेनेचे बाळासाहेब गांगुर्डे जिल्हा परिषद गटात, वणी गणात शिवसेनेचे अॅड. विलास निरगुडे व लखमापूर गणात शिवसेनेचे गणेश शार्दुल विद्यमान सदस्य आहेत. गट व गण शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेला हा गड सुरक्षित आहे, असे मानले जाते. बाळासाहेब गांगुर्डे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश गांगुर्डे यांचा अवघ्या १८ मतांनी पराभव करून जिल्हा परिषद सदस्याचा मान मिळविला होता, तर वणी गणातून अॅड. विलास निरगुडे यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. लखमापूर गणातील गणेश शार्दुल यांनीही विजयश्री खेचून आणली; मात्र आता चित्र बदलले आहे. कसबे वणी गट व गटातील दोन्ही गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. कसबे वणी गटातील गावे पुढीलप्रमाणे- वणी गण : वणी, मावडी, बाबापूर, मुळाणे, संगमनेर, रामनगर, ओझरखेड, कृष्णगाव.
लखमापूर गण : लखमापूर करंजवण, खेडले पिंपरखेड, दहेगाव, पुणेगाव, फोपशी, काजीमाळे, वलखेड, कादवा, म्हाळुंगी, ओझे, वागळुद, म्हेळुस्के परमोरी आदि २२ गावांचा गटात समावेश आहे. सुमारे ४५ हजारांच्या जवळपास मतदार आहेत. जि. प. गटातून सुभाष गांगुर्डे यांनी, तर पंचायत समितीच्या माध्यमातून शिवसेना गटनेता म्हणून विलास निरगुडे व गणेश शार्दुल यांनी विकासाला अग्रक्र म दिला असला तरी तिन्ही जागा यंदा महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमानांचा अपेक्षाभंग झाला आहे. गटासाठी राष्ट्रवादीतर्फे वणीच्या विद्यमान सरपंच सुनीता भरसठ यांची दावेदारी प्रबळ मानली जाते आहे, तर ग्रामपंचायत सदस्य छाया गोतरणे याही स्पर्धेत आहेत.
शिवसेनेने आपले पत्ते अजून उघडलेले नसून ऐनवेळी सक्षम व प्रभावी उमेदवार मैदानात उतरविण्याची व्यूहरचना आखली आहे. कॉँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर माकपही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयारीला लागला आहे. मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषदेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांनी पत्नींना उभे करून सत्तेची दोरी हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या गटात रंगत आहे. दरम्यान, चालू निवडणुकीचे गणित पक्षापेक्षा व्यक्ती हे असू शकते, याचाच आधार घेत इच्छुक सावधगिरीने पावले टाकत आहेत. हीच स्थिती थोड्या फार फरकाने पंचायत समितीच्या दोन्ही गणांसाठीसुद्धा आहे. मात्र या ठिकाणी इच्छुकांची वानवा असल्याने जिल्हा परिषद नाही तर पंचायत समिती अशीही शक्यता नाकारता येत नाही. वणी गट तसेच दोन्ही गणांवर प्रस्थापित वर्चस्व राखण्यासाठी नियोजन आखत असले तरी अस्तित्वाची लढाई सोपी नक्कीच नाही.